ठाणे (प्रतिनिधी लक्ष्मीनारायण वनम) : कल्याणच्या महात्मा फुले पोलिस ठाण्यांतर्गत एका विवाहितेवर तिच्या पतीने अनैसर्गिक शारीरिक संबंध आणि तिच्या दिराने जबरीने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
सदरची घटना कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. ३० वर्षीय विवाहित महिलेचा निकाह ३ मे २०१४ रोजी मुस्लिम रितीरिवाजांनुसार झाला. २०२२ पर्यंत सर्व काही ठीक चालले होते. त्यानंतर पतीने विवाहितेवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, महिलेचा पती आसिफ हा तिच्यासोबत जबरदस्तीने अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवत असे, याबाबत तिने सासू व दिराकडे तक्रार केली होती. सासू-सासऱ्यांनी काहीही समज दिली नाही. त्यामुळे पती आसिफचे मनोबल वाढले आणि तो अनेकदा तिचा शारीरिक छळ करू लागला. २० डिसेंबर २०२४ रोजी महिलेच्या दिराच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्या दिवशी ती घरी एकटी दिसल्यानंतर दिर तौसिफ याने तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला.
हा प्रकार पीडितेने पती आसिफला सांगितल्यावर कारवाई करण्याऐवजी पतीने पत्नी बदला घेऊ, हिशेब चुकते केले जातील असे सांगत प्रकरण पुढे ढकलले. विवाहितेने या घटनेची माहिती आपल्या आईला सांगितली आणि ती भावासह मुंब्रा येथील आपल्या माहेरी आली. मुंब्रा येथे त्यांनी महिला समाजसेविका साबिया हुसैन यांची भेट घेतली आणि त्यांना संपूर्ण हकीकत सांगितली. साबियाच्या मदतीने पती आसिफ, दिर तौसिफ, सासू आणि जावेसह चौघांविरुद्ध कल्याणमधील महात्मा फुले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा तपास महिला पोलीस अधिकारी प्रतिभा माळी करत आहेत, मात्र अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.







