
पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग, रेफ्रिजरेटिंग अँड एअर कंडिशनिंग इंजिनियर्स (इशरे) तर्फे आयोजित ‘ग्रीन कॉन्क्लेव-२०२५’ चे उद्घाटन मुरलीधर मोहोळ (नागरी उड्डाण राज्यमंत्री), रणजित नाईकनवरे (क्रेडाई अध्यक्ष), ज्येष्ठ आर्किटेक्ट संदीप शिखरे, अनूप बलानी (इशरे, राष्ट्रीय अध्यक्ष), आशुतोष जोशी (इशरे पुणे चॅप्टर अध्यक्ष), डॉ. पूर्वा केसकर (परिषद संयोजक) आणि अरविंद सुरंगे (परिषद अध्यक्ष) यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे शुभेच्छा दिल्या.
ही कार्बन-न्यूट्रल परिषद १८ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत सुजलॉन वन अर्थ, मगरपट्टा (हडपसर, पुणे) या ग्रीन बिल्डिंगमध्ये पार पडली. उद्घाटन सत्रात डॉ. करिन मीसेनबर्गर यांचे बीजभाषण झाले. संध्याकाळी ‘शून्य -नेट झिरो एक्सेलेरेटर’ पुरस्कारांचे वितरण माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.या वर्षीची परिषद “शून्य – आपला धर्म ,नेट झिरो उद्दिष्ट साध्य करणे” या संकल्पनेवर आधारित होती.ग्रीन कॉन्क्लेव-२०२५ मध्ये धोरण निर्माते, उद्योगजगतातील मान्यवर आणि नाविन्यपूर्ण विचारमंथन करणारे तज्ज्ञ एकत्र आले. परिषदेत HVACR, रेफ्रिजरेशन, आणि बांधकाम क्षेत्रातील शाश्वत उपायांवर भर देण्यात आला.
ऊर्जा, पाणी आणि कचऱ्यासाठी नेट झिरो लक्ष्य, शाश्वत शीतकरण तंत्रज्ञान, कमी ऊर्जेची मागणी करणारे कूलिंग उपाय, शून्य नेट झिरो एक्सेलेरेटर पुरस्कार, आणि शाश्वत फॅशन शो ही या परिषदेची वैशिष्ट्ये ठरली. परिषदेत करिन मीसेनबर्गर (विएन्ना), दीपेंद्र प्रसाद (दिल्ली), शैलेंद्र शर्मा, श्रुती नारायण, जयधर गुप्ता, आशीष राखेचा, एन. एस. चंद्रशेखर, शेखर गांती, डॉ. सतीश कुमार, जगदीप सिंग, निखिल कुलकर्णी, आर. एस. कुलकर्णी, आणि आदित्य चुणेकर यांनी विविध विषयांवर विचार मांडले.
‘पुण्यामध्ये येत्या काळात लवकरच आंतरराष्ट्रीय कनव्हेंशन सेंटर उभारण्यात येईल’, असे आश्वासन परिषदेच्या उदघाटन प्रसंगी बोलताना खासदार मोहळ यांनी दिले.ते म्हणाले ,’कनव्हेंशन सेंटर उभारणी नंतर या पुढे दिल्ली, मुंबईच्या लोकांनी पुण्यात यावे, अशी माझी अपेक्षा आहे, पुण्यात पर्यावरणाच्या दृष्टीने अनेक भयावह समस्या आहेत, त्या सोडविण्यासाठी ज्या ज्या स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत, त्यांच्या कार्याच्या पाठीशी माझ्यासह सर्व पुणेकरांनी राहून हे शाश्वत विकासाचे काम पुढे नेले पाहिजे’
‘जगातील ६०% लोकसंख्या ही शहरी भागात केवळ २% जमिनीवर राहते आणि हेच शाश्वत विकास साधण्याच्या दृष्टीने अत्यंत आव्हानात्मक काम आहे’, असे मत क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजित नाईकनवरे यांनी व्यक्त केले. नाईकनवरे म्हणाले, “पुणे शहरातील राहणीमानाचा दर्जा अजूनही म्हणावा तसा उंचावलेला नाही, शाश्वत आणि पर्यावरण आणि ग्रीन बिल्डिंग नॉर्मस् पाळून बांधकाम क्षेत्रातील विकास साधणे, हे बांधकाम व्यावसायिकांसाठी मोठे आव्हान आहे ! शून्य नेट झिरो ध्येयासाठी आणि पर्यावरणीय शाश्वत विकासासाठी आमचं बांधकाम उद्योग जगत संपूर्ण सहकार्य करेल ” असे आश्वासनही या वेळी नाईकनवरे यांनी दिले.
आर्किटेक्ट संदीप शिखरे म्हणाले,’प्रत्येक ठिकाणचे स्थानिक हवामान, नैसर्गिक परिस्थितीचा अभ्यास करून बांधकाम क्षेत्रातील विकास आणि काम करणे आवश्यकआहे.इमारत बांधकाम करताना पर्यावरणपूरक बांधकाम साहित्यावर भर देण्याची गरज असून, उर्जा आणि पाण्याच्या बचतीकडे आणि योग्य वापराकडे लक्ष देण्याची गरज आहे.निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याचे लक्ष्य ठेवून विविध पॉलिसीद्वारे कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे उपाय करावे लागेल, आपल्याकडे खरेतर अजूनही नेमका कार्बन नंबर(प्रमाण) उपलब्ध नाही. विमल चावडा यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.पूर्वा केसकर यांनी या परिषदेच्या आयोजनामागील भूमिका मांडली तर आशुतोष जोशी यांनी प्रास्ताविक केले.यावेळी अरविंद सुरंगे यांचेही भाषण झाले.
गोलमेज चर्चेत बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बिल्डर्स सहभागी झाले. या चर्चेत डी-कार्बनायझेशन सनदेतील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. पंकज धारकर यांनी सत्राचे अध्यक्षपद भूषवले, तर डॉ. सुनीता पुरुषोत्तम यांनी मॉडरेटरची भूमिका बजावली.प्रमुख उपस्थितांमध्ये चेतन ठाकूर (इशरे अध्यक्ष-नियोजित), वीरेंद्र बोराडे (इशरे पुणे चॅप्टर माजी अध्यक्ष), सुजल शेठ (कार्यक्रम प्रमुख आणि समन्वयक, सीईओ गोलमेज चर्चा), सुभाष खनाडे (खजिनदार), रशीदा शब्बीर (महिला प्रमुख), आणि देविका मुथा (सह-महिला प्रमुख) यांचा समावेश होता.






