सोमाजीगुडा (आंध्रप्रदेश) : मालमत्तेच्या वाटपावरून झालेल्या वादातून वेलजन ग्रुपचे उद्योगपती जनार्दन राव यांची त्यांच्या नातवाने हत्या केली आहे. ८६ वर्षीय राव यांचा त्यांच्या २९ वर्षी नातू कीर्ती तेजशी वाद झाला. त्यानंतर त्याने ७० हून अधिक वेळा त्यांच्यावर वार केले. ही घटना गुरुवारी रात्री हैदराबाद येथील सोमाजीगुडा येथे त्यांच्या राहत्या घरी घडली. एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना घडली तेव्हा तेजची आईही घटनास्थळी होती. या घटनेतून जनार्दन राव यांना वाचवताना तीही जखमी झाली आहे. मुलगा कीर्ती तेजसह जनार्दन राव यांना तीही भेटायला गेली होती. तो अमेरिकेत मास्टर्सचे शिक्षण घेत होता. तिथून तो परतल्यानंतर जनार्दन राव यांना भेटायला गेला. मात्र, मालमत्तेच्या वाटपावरून त्यांच्यात वाद झाला.
वाटणीत योग्य वाटा मिळाला नसल्याचा दावा त्याने केला आहे. राव यांनी अलीकडेच त्यांच्या मोठ्या मुलीच्या मुलाला वेलजन ग्रुपचे संचालक म्हणून नियुक्त केले हते. त्यांची मुलगी सरोजिनी देवी यांचा मुलगा तेज यांना ४ कोटी रुपयांचे शेअर्सचे वाटप करण्यात आले होते.
वारसा हक्काच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि तेज यांनी राव यांच्यावर योग्य वागणूक दिल्याचा आरोप केला. त्यामुळे त्याने चाकूने राव यांच्यावर ७३ वेळा सपासप वार केले. परिणामी त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्याची आई सरोजिनी देवी जखमी झाली. तो घटनास्थळावरून पळाला असून पोलिसांनी त्याची शोधमोहिम सुरू केली. शोधमोहिमेनंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.







