मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांचा. न्यू इंडिया को- ऑपरेटिव्ह बँकेचा मॅनेजर हितेश मेहताने खातेदारांच्या तब्बल १२२ कोटींवर डल्ला मारलाय. याच घोटाळ्यामुळे आरबीआयने बँकेवर कठोर निर्बंध लादलेत. त्यामुळे खातेदार हवालदिल झाले आहेत. न्यू इंडिया बँकेचा मॅनेजर हितेश मेहताने बँकेतील १२२ कोटी लाटल्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेनं त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
हितेशकडे बँकेची रोख रक्कम सांभाळण्याची जबाबदारी होती. कोरोना काळापासून मेहताकडून घोटाळा सुरू होता. मेहताने प्रभादेवीच्या शाखेतून ११२ तर गोरेगाव शाखेतून १० कोटी लाटले. घोटाळ्याचा पैसा नातेवाईक आणि मित्रांच्या खात्यावर वळवल्याची माहिती समोर आली आहे. जर पाच वर्षांपासून हा घोटाळा सुरू होता तर रिझर्व्ह बँकेनं ऑडिट का केलं नाही? असा सवाल उपस्थित करत मेहताच्या वकीलांनी रिझर्व्ह बँकेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय.
ग्राहकांच्या ठेवींना ५ लाखांचं विमा संरक्षण आहे. बँक बुडाल्यास ५ लाखापर्यंतच्या ठेवी परत मिळणार. कागदपत्रांच्या तपासानंतर ९० दिवसात ठेवींचे पैसे मिळणार मात्र ५ लाखांपेक्षा जास्त रक्कम असल्यास त्यावरील रक्कम बुडणार. अनेकदा बँकेचं संचालक मंडळ, मॅनेजर हे घोटाळा करतात आणि त्यामुळे खातेदार उध्वस्त होतात. अशा घटना घडूच नयेत आणि सर्वसामान्य खातेदार उध्वस्त होण्यापासून वाचण्यासाठी रिझर्व्ह बँकेने कठोर नियमावली तयार करायला हवी. एवढंच नाही तर सातत्याने बँकांचं ऑडिट करुन घोटाळे होण्याआधीच त्यांना पायबंद घालायला हवा, अशी मागणी ठेवीदारांकडून होत आहे.







