अहिल्यानगरमध्ये गटाराच्या चेंबरमध्ये कोंबून तरुणाची हत्या

crime
file photo

अहिल्यानगर (जिल्हा क्राईम रिपोर्टर अण्णासाहेब बनसोडे) : येथे दोन तरुणांना गटाराच्या चेंबरमध्ये ठेऊन अमानुष मारहाण केली गेली. यात एका तरुणाचा मृत्यू झाला आणि त्याचा मृतदेह डोंगरावर नेऊन जाळण्यात आला. या घटनेनंतर पोलिसांनी ९ आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने या आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. आरोपींच्या विरोधात तपासाची प्रक्रिया सुरु आहे.

 

 

२२ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता वैभव ऊर्फ सोन्या नायकोडी (१९, रा. ढवणवस्ती, अहिल्यानगर) या तरुणाचे अपहरण करण्यात आले होते. यापूर्वी २१ फेब्रुवारी रोजी आरोपींनी संदेश भागाजी वाळूंज ऊर्फ गोट्या (१९, रा. नवनागापूर, एमआयडीसी) याचेही अपहरण केले होते. या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला असून, आरोपींच्या शोधासाठी विविध पद्धतींनी कारवाई सुरू आहे.

 

संदेशला त्याच्या घरातून बोलावून एका कारमध्ये घालून त्याची बेदम मारहाण केली गेली. त्यानंतर त्याला एका निर्जनस्थळी घेऊन गटारीच्या चेंबरमध्ये कोंबून मारहाण करण्यात आली. आरोपींनी या मारहाणीचा व्हिडीओ काढला आणि संदेशला नागापूरमधील एका फ्लॅटमध्ये रात्रभर बंदी ठेवले. दुसऱ्या दिवशी २२ फेब्रुवारीला संदेशच्या मोबाइलवर वैभव नायकोडीचा मेसेज आल्यावर, आरोपींनी संदेशला त्याला फोन करून वैभवला बोलवण्यास सांगितले. संदेशने फोन करून वैभवला तपोवन रोडवरील एका रुग्णालयाजवळ बोलवले.

 

आरोपींनी संदेशच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्याला वैभव ज्या सलूनमध्ये थांबला होता, तिथे नेले. तिथे नायकोडीची ओळख पटवून त्यांना पुन्हा निर्जनस्थळी घेऊन जाऊन गटारीच्या चेंबरमध्ये कोंबून मारहाण केली. रात्री त्यांना फ्लॅटमध्ये डांबले आणि मॅगी खायला दिली. संदेशने मॅगी खाल्ली पण वैभवने नकार दिला. म्हणून त्याला पुन्हा मारहाण केली. दुसऱ्या दिवशी पहाटे वैभवला उठविण्याचा प्रयत्न केला पण तो उठत नव्हता. तो मयत झाल्याचे लक्षात येताच, आरोपींनी त्याचा मृतदेह मनमाड रोडवरील केकताई डोंगरात जाऊन जाळला. त्यानंतर आरोपींनी संदेशाला धमकी देऊन सोडले. वैभवच्या खुनाची घटना उघड झाल्यानंतर संदेश पोलिसांकडे गेला आणि सर्व हकीकत सांगितली.

 

तरुणांच्या दोन टोळ्यांमध्ये वाद असल्याचे समोर आले आहे. १९ जानेवारीला आरोपी अनिकेत सोमवंशीवर एका अल्पवयीन मुलासोबत इतर पाच जणांनी कोयत्याने वार केले होते. मयत वैभव नायकोडी आणि संदेश हे त्या टोळीसोबत होते, ज्यामुळे रागाच्या कारणावरून त्यांचे अपहरण करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here