पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : एकेकाळी महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर, ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट अशी ओळख असलेल्या शांतता प्रिय पुणे शहरात कायदा सुव्यवस्था ढासळली असुन वाढत्या गुन्हेगारी मुळे पुणे शहर हिंसेची राजधानी, दहशतीचे माहेरघर झाले आहे.
पोर्शे कार अपघात, कोयता गँग, दिवसाढवळ्या गोळीबार, चेन चोरी, बलात्कार, विनयभंग, अपघात, खून अशा गुन्ह्यांनी पुणे शहर सतत चर्चेत आहे. लहान लहान मुलांकडे पिस्तूल, कोयता असे हत्यार आढळून येत आहेत. छोट्या मोठ्या कारणांवरून शहरात खून होत आहेत, अंमली पदार्थांचा सुळसुळाट झाला आहे. या परिस्थितीवर गुन्हेगारांवर पोलीस प्रशासन आणि गृहमंत्र्यांचा वचक राहिला नसुन कायदा सुव्यवस्था ढासळली आहे, याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित राहून जिल्हाधिकारी यांना पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आणि वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर पाऊले उचलावित आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन सादर केले. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष प्रदेशाध्यक्षा ॲड.रोहिणी खडसे खेवलकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे शहराध्यक्ष प्रशांतभाऊ जगताप, राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे शहराध्यक्ष स्वातीताई पोकळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.







