पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : राज्यातील विविध भागात गेल्या दोन दिवसांपासून तुफान पाऊस सुरू आहे. मान्सूनच्या पहिल्याच पावसाने अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. भिंती खचल्या आहेत. रस्त्यांना नदीचे स्वरूप आल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून दौंड, इंदापूर, बारामतीसह पुण्यातील अनेक भागात पावसाने थैमान घातले आहे. पुण्यातील दौंडमध्ये एका पोल्ट्री फार्मची भिंत ढासळून तब्बल १८ हजार कोंबड्यांच्या जागीच मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे.
दौंड तालुक्यातील हातवळण गावात शुभम गोगावले यांचा कुक्कुट पालनाचा व्यवसाय आहे. यांच्या शेडमध्ये जवळपास २२ ते २३ हजार पक्षी होते मात्र भिंत ढासळल्याने यापैकी जवळपास १८ हजार पक्षांचा मृत्यू झाल्याचा अंदाज लावला जातोय. आतापर्यंत या शेडमधून ९ ते १० हजार मृत पक्षी बाहेर काढण्यात आले आहेत.
अवघ्या वर्षभरापूर्वी शुभम गोगावले यांनी कर्ज घेऊन पोल्ट्री शेड बांधलं होतं. या शेडमध्ये जवळपास २२ ते २३ हजार पक्षांपैकी तब्बल १८ हजार कोंबड्यांचा जागीच मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसात झालेल्या वादळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. जोराच्या वादळाने पोल्ट्री फार्मच्या शेड वरील पत्रे उडले असून भिंतही कोसळली.







