सातारा (उपसंपादक लव चव्हाण) : देशातील सुमारे ३५६ किल्ल्यांपैकी ५६ गडकिल्ले मोठ्या उत्साहात गिरीप्रेमींनी सर केले. येथील शिवकालीन इतिहास समजून घेतला तर उर्वरित गड किल्ले समजावून घेण्यासाठी गिरीप्रेमी ग्रुप इच्छुक आहे. खटाव – माण या दुष्काळी तालुक्यातील गड किल्ले व येथील तत्कालीन मावळ्यांमुळे औरंगजेबाचे २७ वर्षाचे वास्तव्य खडतर बनल्याचे मत इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी मांडले.
खटाव तालुक्यातील भूषणगड येथे गिरीप्रेमी ट्रेकिंग ग्रुपने ५६ वा ट्रेक पार केल्यानंतर इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे बोलत होते .याप्रसंगी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख, डॉ हेमंत मगर, गणेश देशमुख, डॉ. मीरा मगर, दीपक लाड, प्रा. जयदीप पाटील, सोमनाथ गोडसे, अभिमन्यू पाटील, राहुल पोकळे, बाळासाहेब बेंद्रे पाटील, शेखर शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी श्रीमंत कोकाटे पुढे म्हणाले की, कोणतीही आधुनिक साधने व सोयी उपलब्ध नसताना देखील अठरापगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलशाही, आदिलशाही, निजामशाही आदी मोडीत काढली. तेराव्या शतकात यादव राजा सिंघण यांनी भूषणगड किल्ला बांधला . पुढे तो बहामनी राजवाटीकडे आणि नंतर १७०० साली आदिलशहाकडे होता . मराठ्यांच्या इतिहासात या किल्ल्यांचे अनन्यसाधारण महत्त्व असून छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला होता. कोट्यावधीचा खजिना आणि लाखोंची फौज घेऊन मराठ्याविरुद्ध लढणाऱ्या औरंगजेबाला मराठ्यांनी महाराष्ट्राच्या मातीतच गाडले त्यामध्ये भूषणगड खटाव – माणच्या रणभूमीचे मोलाचे योगदान दिलेले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन गवळी यांनी केले तर आभार पी. एन. पाटील यांनी मांडले याप्रसंगी रवींद्र ढमढेरे, दिलीप शितोळे, प्रमोद देशमुख, चंद्रकांत पाटील, विनोद गलांडे, राहुल कांबळे, इंद्रजीत पाटील, सुशांत पाटील यांची उपस्थिती होती.







