कल्याणी (वृत्तसंस्था) : पश्चिम बंगालमधील कल्याण येथील न्यायालयाने ‘डिजिटल अटक’ फसवणूक प्रकरणात महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या प्रकरणात, शुक्रवारी १९ जुलैला नऊ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली, देशातील अशा प्रकारच्या सायबर गुन्हेगारीवर प्रथमच कठोर कारवाई करण्यात आली आहे.
या टोळीने देशभरातील तब्बल १०८ लोकांना सुमारे १०० कोटी रुपयांची फसवणूक केली आहे, ज्यात अनेक ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. पीडितांना ‘डिजिटल अटक’ची धमकी देऊन त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळण्यात आले होते. कल्याणी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुबर्थी सरकार यांनी गुरुवारी १८ जुलैला सर्व नऊ आरोपींना दोषी ठरवले होते आणि शुक्रवारी त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या आरोपींनी गेल्या वर्षी राणाघाट येथील एका रहिवाशाला ‘डिजिटल अटक’ची धमकी देऊन १ कोटी रुपयांची फसवणूक केली होती. या टोळीतील आरोपींना महाराष्ट्र, हरियाणा आणि गुजरात येथून अटक करण्यात आले होते. यात एका महिलेचाही समावेश आहे. या गुन्हेगारांनी विविध राज्यांमध्ये आपले जाळे पसरवले होते आणि अनेक लोकांची फसवणूक केली होती. या प्रकरणाचा तपास ५ महिन्यांपेक्षा जास्त काळ चालला आणि या दरम्यान २९ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. पोलीसानी २६०० पानांचे आरोपपत्र दाखल केले होते.







