अहिल्यानगर (जिल्हा क्राईम रिपोर्टरअण्णासाहेब बनसोडे) : पत्नीशी झालेल्या कौटुंबिक वादामुळे निर्दयी पित्याने दारूच्या नशेत आपल्या चार निष्पाप मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना राहाता तालुक्यातील कोर्हाळे शिवारात शनिवारी घडली.
श्रीगोंदा तालुक्यातील चिखली कोरेगाव येथील अरुण सुनील काळे (वय ३५) याने आपली पत्नी माहेरी गेल्याने नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलले. त्याने आपली मुलगी शिवानी (वय ८), प्रेम (वय ७), वीर (वय ६) आणि कबीर (वय ५) या मुलांसोबत राहता येथील कोर्हाळे शिवारात भाऊसाहेब धोंडीबा कोळगे यांच्या शेतातील विहिरीवर आला. त्याने मुलांना विहिरीत ढकलून दिल्यानंतर दारूचे सेवन केले आणि त्यानंतर स्वतःही हात-पाय दोरीने बांधून विहिरीत उडी घेतली. घटनास्थळी पोलिसांना दारूच्या बाटल्या सापडल्यामुळे हे कृत्य नशेत केल्याचा संशय बळावला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून अरुण काळे यांची होंडा शाईन (एमएच १७ डीएल १९४४) क्रमांकाची मोटरसायकल ताब्यात घेतली आहे.
पती पत्नीचे वाद झाल्यानंतर गत आठ दिवसांपासून अरुण काळे यांची पत्नी शीला काळे या येवला येथील माहेरी गेल्या होत्या. पत्नी परत न आल्याने काळे यांनी आश्रम शाळेत जावून मुलांची कटींग करायची आहे असे कारण शिक्षकांना देत शाळेतुन मुलांना ताब्यात घतले. त्यानंतर त्याने पत्नी शीला यांना फोन करून मुलांना संपवण्याची धमकी दिली असल्याची माहिती समोर आली आहे.
अरुण काळे यांची मुले बहिरवाडी, मेहेकरी येथील वीरभद्र प्राथमिक आश्रम शाळेत शिकत होती. शनिवारी अरुण काळे शाळेत गेला आणि मुलांची कटिंग करायची असल्याचे कारण देत मुलांना सोबत घेऊन आला. मुलांना सोबत घेऊन आला. त्यानंतर तो मुलांना घेऊन थेट केलवड ते कोर्हाळे बायपास रोडजवळील विहिरीवर आला आणि हे भयानक कृत्य केले.या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. पोलीस आणि बचाव पथक (रेस्क्यू टीम) तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
रात्री उशिरापर्यंत बचाव पथकाने अरुण काळे, यांच्यासह चारही मुलांचे मृतदेह विहीरीतुन बाहेर काढले आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामिण रूग्णालयात पाढविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घार्गे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्यासह राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी उपस्थित होते.







