पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) । शहरातील बिबवेवाडी परिसरात एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका १५ वर्षीय राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी खेळाडू मुलीवर कोयता आणि चाकूने वार करून हत्या केल्याचे समोर आले आहे. तब्बल चाकूने २२ वार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. एकतर्फी प्रेमातून ही हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तब्बल चार वर्षांनी हा निकाल सुनावण्यात आला. चार वर्षानंतर पीडित कुटुंबियांना न्याय मिळाला आहे.
या खटल्यात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. हेमंत झंजाड यांनी जोरदार युक्तिवाद केला. युक्तिवादात आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत अमानुष आणि समजला हादरवणारा असल्याचे त्याला मुर्त्युदंड देण्यात यावा अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली होती. समाजात कठोर संदेश जावा आणि अशा प्रवृत्तीला आळा बसावा, यासाठी फाशीची शिक्षा योग्य ठरेल असा युक्तिवाद त्यांनी केला. यासाठी साक्षीदारांच्या साक्षींसह उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा आधारही सादर करण्यात आला होता.
ही घटना १२ ऑक्टोबर 2021 रोजी बिबवेवाडीतील एका लॉन्समध्ये घडली होती. आरोपीचं नाव शुभम ऊर्फ ऋषिकेश बाजीराव भागवत असे आहे. आरोपीने अत्यंत क्रूरपणे मुलीवर वार करून तिची हत्या केली होती. शवविच्छेदन अहवालात मृतदेहावर एकूण २५ जखमा आढळून आल्या होत्या. यामुळे हत्येची भीषणता स्पष्ट झाली.
न्यायालयाने सरकारी तसेच बचाव पक्षाचे सर्व युक्तिवाद सखोलपणे ऐकून घेतले. हा गुन्हा अत्यंत गंभीर आणि क्रूर स्वरूपाचा असला तरी तो ‘दुर्मीळातील दुर्मीळ’ प्रकरणांच्या चौकटीत मोडतो का, याचा विचार करण्यात आला. भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अंतर्गत आरोपी दोषी ठरवत त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.







