पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) । पत्नी वारंवार सोन्याच्या दागिन्यांची वारंवार मागणी करत होती.याचाच राग मनात धरून पतीने पत्नी नम्रता शैलेंद्र व्हटकर (वय १९, रा. शिरसवडी, ता. हवेली) चाकूने वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपी पती शैलेंद्र प्रकाश व्हटकर (वय ३०, रा. बकोरी, ता. हवेली) याला अटक केली असून हत्येत वापरलेला लोखंडी चाकूही जप्त करण्यात आला आहे.
आरोपी शैलेंद्र आणि मृतक नम्रता हे दाम्पत्य वाडेबोल्हाई परिसरात राहत होते. नम्रता हिचे काही सोन्याचे दागिने गहाण ठेवलेले होते. ते दागिने सोडवून देण्याची मागणी ती वारंवार पतीकडे करत होती. याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. घटनेच्या दिवशी शैलेंद्र याने नम्रता हिला वाडेबोल्हाई परिसरात बोलावून घेतले. यावेळी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. या वादातून संतप्त झालेल्या शैलेंद्र याने त्याच्याकडील लोखंडी चाकूने नम्रताच्या गळ्यावर आणि चेहऱ्यावर वार केले. या हल्ल्यात नम्रता गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.







