रांधे येथे श्रध्देचा महासागर उसळणार; श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त भव्य सप्ताह व यात्रा महोत्सव

श्री स्वामी समर्थ

पारनेर (उपसंपादक दिपक भिका वरखडे) । भक्तांच्या हाकेला धावून येणारे, संकटसमयी आधार देणारे आणि कृपादृष्टीने जीवन उजळविणारे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पावन प्रकट दिनानिमित्त रांधे येथे दि १६ मार्च ते २० मार्च दरम्यान भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा संगम असलेला भव्य सप्ताह व यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.

या निमित्ताने दि . १६ ते १९ या कालावधीत दररोज भाविकांच्या अंतःकरणाला स्पर्श करणारी स्वामी कथा, तर दि १९ व २० मार्च रोजी पारंपरिक पद्धतीने भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या संपूर्ण उत्सवाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध व भक्तकेंद्रित पद्धतीने करण्यात येत असून, दि. २५ फेब्रुवारी रोजी यात्रा नियोजन समितीची निवड करण्यात आली आहे.
देवस्थानचे सर्व सेवेकरी, ग्रामस्थ आणि स्वामीभक्त “भक्तांना कोणताही त्रास होऊ नये” या संकल्पनेतून देवस्थानचे स्वामी सेवेकरी सज्ज झाले असून, शिस्तबद्ध दर्शन रांग व्यवस्था, पाणी, स्वच्छता, वैद्यकीय सुविधा व सुरक्षिततेची विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. दि . २० रोजी सायंकाळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका व प्रतिमेची पारंपरिक व भक्तिभावपूर्ण मिरवणूक काढण्यात येणार आहे. ढोल-ताशांचा गजर , जयघोष आणि भक्तीमय वातावरणात निघणारी ही मिरवणूक म्हणजे भाविकांसाठी अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभूती ठरणार आहे.
या यात्रा समितीच्या अध्यक्षपदी दिपक मावळे, तर उपाध्यक्षपदी सतीश लामखडे व रावसाहेब भदे, कार्याध्यक्ष- लहू गागरे, सचिव – संतोष निचित, सहसचिव – प्रवीण वराळ, खजिनदार-सुभाष भोसले, सहखजिनदार-प्रशांत पवार , सल्लागार- मच्छिंद्र टावरे, समन्वयक – दत्तात्रय बाबर आणि संदीप गहाणडुले, यांची निवड करण्यात आली आहे. तर महिला अध्यक्षपदी सारिका सरोदे आणि उपाध्यक्ष पदी रेश्मा खडके,शीतल शिरोळे यांची वर्णी लागली, कार्याध्यक्ष – रेश्मा घोलप, सल्लागार म्हणून रत्नमाला शेटे, समन्वयक – अश्विनी वरखडे,जयश्री पावडे, या समिती प्रमुख पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सोहळा नियोजनबद्ध व यशस्वी करण्यासाठी सर्व स्तरावर तयारी सुरू आहे. या महोत्सवासाठी पारनेर, जुन्नर, संगमनेर, नगर, शिरूर आणि अनेक तालुक्यांतून व परिसरातील गावांतून हजारो स्वामीभक्त दर्शनासाठी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रांधे येथील हे स्वामीस्थान नवसाला पावणारे, जागृत व अनुभूती देणारे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते.
स्वामी कथेतून मिळणारी आत्मशांती, यात्रेतील भक्तीचा ओघ आणि स्वामीकृपेची अनुभूती अनुभवण्यासाठी सर्व स्वामीभक्तांनी या पावन सप्ताह व यात्रा महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी श्री स्वामी देवस्थानचे संस्थापक अनिल आवारी,योगेश जोरी,किशोर कुंभकर्ण,अनिल गाडगे,मच्छिंद्र गलांडे, संतोष घोलप, संतोष खडके, अविनाश लाळगे,विलास काटे,मुकेश निघूट,बाळासाहेब आवारी, सुरेश घोलप,मीनाक्षी काटे, छाया पावडे, रेश्मा वराळ, रेश्मा गलांडे,सुनीता सरोदे व इतर श्री स्वामी भक्त उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here