इंदापूर (प्रतिनिधी गणेश धनवडे) | इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब ता. इंदापूर येथे भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव वीरसिंह रणसिंग यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत उपस्थितांनी राष्ट्रगीत गायले.
अध्यक्षीय मनोगतात सचिव वीरसिंह रणसिंग यांनी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्यागाची आठवण करून देत विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचे महत्त्व समजून घेऊन देशाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले. शिक्षण हे केवळ नोकरी मिळविण्याचे साधन नसून समाज आणि राष्ट्राच्या विकासाचे प्रभावी माध्यम आहे. विद्यार्थ्यांनी शिस्त, प्रामाणिकपणा, सामाजिक बांधिलकी आणि संविधानिक मूल्ये आत्मसात करून जबाबदार नागरिक बनावे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुहास भैरट यांनी केले. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान, त्याग व बलिदान यांची माहिती दिली.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे यांनी शुभेच्छा संदेश देताना स्वातंत्र्याचा खरा अर्थ केवळ परकीय सत्तेपासून मुक्तता नसून सामाजिक, शैक्षणिक व वैचारिक प्रगती साधणे हा असल्याचे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अभिजीत शिंगाडे यांनी केले. यावेळी उपप्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर गुळीग, डॉ. प्रशांत शिंदे, सर्व शाखाप्रमुख, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.‘जय हिंद’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी महाविद्यालय परिसर दुमदुमून गेला. उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.







