मुंबई – प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये काम करणारे अनेक पत्रकार, कॅमेरामन, तंत्रज्ञ व इतर मिडीयाकर्मी कोरोना प्रादुर्भावाच्या काळातदेखील आपला जीव धोक्यात घालून स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या घडामोडींबाबत जनतेला माहिती पुरविण्याचे काम करत आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने लॉकडाऊनच्या काळात माध्यमांना अत्यावश्यक सेवेत समाविष्ट केले आहे. त्यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पत्रकार दिवसाचे २४ तास आपली सेवा बजावत आहेत.
मात्र मुंबईत सुरु झालेल्या विशेष लोक ट्रेनमधील प्रवासासाठी अत्यावश्यक सेवेतून या पत्रकारांना वगळण्यात आले आहे. मिडीयातील अनेक कर्मचारी नाईलाजाने पर्यायी व्यवस्थेचा भुर्दंड सहन करत लोकांपर्यंत बातमी पोहचविण्याचे काम अविरतपणे करत आहेत. आता जर विशेष लोकल ट्रेन अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु केली आहे तर मग लोकशाहीचा चौथा स्तंभ यापासून वंचित का ठेवण्यात येत आहे, असाही सवाल ऑल इंडिया मिडीया एम्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष गोरक्ष सदाशिव धोत्रे यांनी प्रसिध्दीपत्रकातून केला आहे.






