पंढरपूर (विशेष प्रतिनिधी) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिक संख्येने जमाव जमवून शासकीय नियमांचे उल्लंघन करणे, साथरोग प्रतिबंध कायदा, महाराष्ट्र पोलिस अधिनियम व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार सोशल डिस्टन्स न ठेवणे, मास्कचा वापर न करणे आदी कारणांमुळे ‘वंचित’चे प्रकाश आंबेडकर, विश्व वारकरी संघटनेचे बुरघाटे महाराज, आनंद चंदनशिवे (रा. सोलापूर), धनंजय वंजारी, अशोक सोनोणे, रेखाताई ठाकूर, हभप नामद महाराज, बबन शिंदे, सागर गायकवाड (रा. पंढरपूर), रवि सर्वगोड, गणेश महाराज शेटे (रा. अकोला, जि. अकोला), माऊली हळणवार (रा. ईश्वर वठार, ता. पंढरपूर) असे १२०० जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
या १२०० जणांनी दि. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते १५.१५ वाजता दरम्यान शिवाजी चौक, पंढरपूर येथे लोकांची गर्दी जमवून आंदोलन केले. यावेळी सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर न करता जिल्हा दंडाधिकारी सोलापूर जिल्हा यांच्या आदेशानुसार, कोरोना रोगाच्या अनुषंगाने लॉकडाऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना आदेश पारीत केला होता. तो आदेश झुगारून ११०० ते १२०० जणांनी जमाव जमवून मास्क न घालता व सोशल डिस्टन्सिंग न पाळता संचारबंदी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, साथीचे रोग प्रतिबंध अधिनियममधील तरतुदींचे उल्लंघन केले. ठिय्या आंदोलनासाठी एकत्र जमा होवून मोठमोठ्याने घोषणाबाजी केली होती.







