मुंबई – शिवसेनेने विचारधारा बदलली नाही आणि शिवसेना कुणापुढे लाचारही होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री व शिवसेनाप्रमुखउद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिली. शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसेना मंत्री, नेते व पदाधिकाऱ्यांशी बोलतांना सांगितले.
शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी विविध विषयांवर आपले मत व्यक्त केले आहे. यामध्ये आपल्यासोबत राजकारण करण्याचा जो प्रयत्न झाला, तो मोडीत काढण्यासाठीच मी आज मुख्यमंत्री म्हणून बसलो आहे असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच विश्वास ठेवणे ही आमची कमजोरी नाही आमची संस्कृती आहे. ‘प्राण जाय पर वचन न जाये’ ही आमची संस्कृती आहे. ही लाचार होणारी शिवसेना नाही आणि तुमचा शिवसेनाप्रमुखसुद्धा लाचार होणार नाही, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.






