मुंबई (हितेश मिस्त्री) – बॉलिवूड क्विन कंगना राणावत हिच्या वादग्रस्त वक्तव्यांनी महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. मुबंई पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या कंगनाला मुबंईत राहण्याचा अधिकार नाही. अशा शब्दांत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खडे बोल सुनावले होते. त्यानंतर आता मात्र ट्विटमागून ट्विट करणाऱ्या कंगनाचा सूर नरमला आहे. महाराष्ट्राबद्दल तिने कृतज्ञता व्यक्त केल्याने वाद थांबण्याची चिन्हे दिसत आहेत.
”महाराष्ट्रासह सर्वत्र असलेल्या मित्रांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे कोणतेही शब्द नाहीत. त्यांना माझा हेतू माहित आहे. माझी कर्मभूमी मुंबई आहे आणि मुंबईबद्दल असलेले माझे प्रेम सिद्ध करण्याची गरज नाही. मला स्वीकारणाऱ्या मुंबईला मी यशोदा मातेचा दर्जा दिलाय. जय मुंबई, जय मुंबई, जय महाराष्ट्र…,” असे कंगनाने ट्विट करत आपला सूर बदलला आहे.
कंगनाने मुंबईची तुलना पाकिस्तान व्याप्त काश्मीरशी केली होती. तिच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी, आम्ही केवळ पोकळ धमक्या देत नाही, तर थेट कृती करतो, असा इशारा दिला होता. मुंबईबाबत बरळणाऱ्या मेंटल केसेस आरोग्य खात्याने हाताळाव्यात. मुंबई पोलिसांनी कठोर पावलं उचलावीत, असे वक्तव्य राऊतांचे केले होते.
मी मुंबईत परतून येऊ नये म्हणून लोक मला धमकी देत आहेत. पण, मी आता निर्णय घेतला आहे की, येणाऱ्या आठवड्यात ९ सप्टेंबरला मी मुंबईला येण्याचा निर्णय घेतला आहे. मी मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर मेसेज पोस्ट करेन. कुणाच्या बापाची हिंमत असेल, मला रोखून दाखवा, असे कंगना राणावतने आव्हान दिले होते.







