असलम शेख यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले पत्र
मुंबई (विशेष प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य माहिती आयोग अंतर्गत पुणे, नाशिक आणि औरंगाबाद येथे माहिती आयुक्त नेमणुका करत माहिती अधिकार कायद्यास बळकटी देण्याची आवश्यकता असल्याचे मत मांडत मुंबई शहराचे पालकमंत्री आणि वस्त्रोद्योग मंत्री असलम शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांस पत्र पाठविले आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई शहराचे पालकमंत्री आणि वस्त्रोद्योग मंत्री असलम शेख यांस पाठविलेल्या पत्रात नमूद केले होते की सदर पदे रिक्त असून सद्या अतिरिक्त प्रभार अन्य राज्य माहिती आयुक्तांना दिल्यामुळे याचा प्रभाव आयोगाच्या कामकाजावर होत आहे. असलम शेख यांनी गलगली यांच्या पत्राचा हवाला देत थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून निर्णय घेण्याची विनंती केली आहे.
अनिल गलगली यांच्या मते सद्यस्थितीला 51 हजारांहून अधिक अपील तर 7 हजार तक्रारी प्रलंबित आहे. राज्य माहिती आयोगावर माहिती आयुक्त यांची नेमणूक केल्यास अपील संख्येत कमी होईल. सद्यस्थितीला मुख्य माहिती आयुक्त आणि 6 राज्य माहिती आयुक्त असे 7 खंडपीठ आहेत. 3 माहिती आयोग खंडपीठ यात माहिती आयुक्त पदे रिक्त आहेत. ही पदे तत्काळ भरली तर यामुळे अपील निराकरण तत्काळ होईल आणि नागरिकांना जलद माहिती मिळेल.
महाराष्ट्र राज्य माहिती आयोग अंतर्गत पुणे, नाशिक आणि औरंगाबाद येथे माहिती आयुक्त नेमणुका करत माहिती अधिकार कायद्यास बळकटी देण्याची आवश्यकता आहे, असे गलगली यांचे म्हणणे आहे.







