ऐन दिवाळीत महाराष्ट्राचे दोन वीरपूत्र पाकशी लढतांना शहीद

rushikesh-jondhale

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – कुरापतखोर पाकिस्तानने ऐन दिवाळीत शस्त्रसंधीचे उल्लंघन करताना नियंत्रण रेषा भागात गोळीबार केला असून त्यात शहीद झालेल्या तीन जवानांपैकी दोन जवान महाराष्ट्रातील असल्याची माहिती मिळाली आहे. कोल्हापूर आणि नागपूर येथील दोन जवानांना काश्मीर येथे सुरू असलेल्या धुमश्चक्रीत वीरमरण पत्करावे लागले आहे.

 

 

नियंत्रण रेषेला लागून असलेल्या डावर, केरन, उरी, नौगाम या भागांना पाकिस्तानकडून लक्ष्य करण्यात आलं आहे. पाक सैन्याच्या गोळीबाराला भारतीय लष्कराकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात येत असून सीमा सुरक्षा दलातील उपनिरीक्षक, दोन जवान या धुमश्चक्रीत शहीद झाले आहेत तर सहा नागरिकांनाही प्राण गमवावे लागले आहेत. श्रीनगर येथील संरक्षण विभागाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, शहीद झालेल्या जवानांमधील दोन जवान महाराष्ट्रातील आहेत. नागपूर येथील भूषण रमेश सतई आणि कोल्हापुरातील ऋषिकेश रामचंद्र जोंधळे या दोन जवानांना पाक सैन्याशी लढतान वीरमरण आले आहे.

 

ऋषिकेश हा जवान अवघ्या २० वर्षांचा होता. कोल्हापूरमधील आजरा तालुक्यातील बहिरेवाडी हे त्याचे गाव असून ऋषिकेशच्या निधनाची बातमी गावात येताच संपूर्ण बहिरेवाडी पंचक्रोशीवर ऐन दिवाळीत शोककळा पसरली आहे. ऋषिकेश हा ६ मराठा बटालियनमध्ये सेवा बजावत होता. ११ जून रोजी त्याने ड्युटी जॉइन केली होती. राष्ट्रीय खेळाडू असल्याने त्या माध्यमातून त्याची भारतीय लष्करात भरती झाली होती. त्याला एक लहान बहीण असून ऋषिकेशच्या निधनाने दु:खाचा डोंगरच जोंधळे कुटुंबीयावर कोसळला आहे. दरम्यान, ऋषिकेशचे पार्थिव उद्या रात्रीपर्यंत गावात पोहचेल असे सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here