मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरुण चव्हाण) – लॉकडाउननंतर जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच राजधानी दिल्लीत कोरोनाची लाट आली आहे. त्यामुळे कोरोना झपाट्यानं पसरत असून, दिल्लीपाठोपाठ मुंबईतही कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. मुंबईसह राज्यातही दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात आलेली आहे.
त्यामुळे राज्य सरकारकडून मुंबई-दिल्ली विमान व रेल्वे सेवा बंद करण्याची शक्यता आहे. तसा विचार सुरू असल्याचं वृत्त इंडिया टुडेनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. दिवाळीच्या आधीच दिल्लीत कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होण्यास सुरूवात झाली होती.
गेल्या दहा दिवसांत दिल्लीत ६० हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. दिल्लीबरोबरच मुंबईसह महाराष्ट्रातही रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन राज्य सरकार दिल्ली – मुंबई हवाई व रेल्वे सेवा बंद करण्याची शक्यता आहे. तसा विचारही राज्य सरकार करत असल्याची माहिती समोर आली आहे.







