मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – मुंबई, ठाण्यातील शाळा विद्यार्थ्यांसाठी डिसेंबरअखेपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्या तरी यापूर्वीच्या निर्णयानुसार शिक्षकांना शाळेत जावे लागणार का अशा संभ्रमात शिक्षक आहेत.
यापूर्वी ५० टक्के शिक्षकांना शाळेत येणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यानंतर २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचेही जाहीर केले. मात्र, शाळा विद्यार्थ्यांसाठी डिसेंबरअखेपर्यंत बंदच राहतील असा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानुसार सोमवारपासून (२३ नोव्हेंबर) शिक्षकांनी शाळेत हजर राहाणे अपेक्षित आहे. मात्र, रुग्णसंख्या वाढत असताना शिक्षकांनी शाळेत कसे जावे? शिक्षकांच्या करोना चाचण्याही झालेल्या नाहीत, चाचणी केलेल्या अनेक शिक्षकांचे अहवाल अद्याप मिळालेले नाहीत, अशावेळी शिक्षकांना शाळेत बोलावणे धोकादायक असल्याचा आक्षेप संघटनांनी घेतला आहे.
त्याचबरोबर ऑनलाइन वर्ग घेण्यासाठी शाळेत येणाऱ्या सर्व शिक्षकांना सुविधा पुरवणे अनेक शाळांना शक्य नाही अशावेळी शिक्षक शाळेत येऊन ऑनलाइन वर्ग कसे घेणार असाही प्रश्न शिक्षक, मुख्याध्यापकांनी उपस्थित केला आहे.







