मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष आणि मच्छिमारांची बाजू सतत लावून धरणारे लढवय्ये कामगार नेते दामोदर तांडेल यांचे काल (दि.४) निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. करोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांना ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मागे पत्नी पूनम, दोन मुले, दोन सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
तांडेल यांचे काल दुपारी साडे बाराच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज रात्री चंदनवाडी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. तांडेल यांचे पालघर हे मूळ गाव. आपली कर्मभूमी मुंबई असलेले तांडेल दक्षिण मुंबईतील कफ परेडच्या मच्छिमार नगरात रहात होते. हिंदुस्तान लिव्हर कंपनीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपले पुढील आयुष्य मच्छिमारांना न्याय मिळवून देण्यासाठी वाहिले. हिंदुस्तान लिव्हरमध्ये देखील ते कामगार संघटनेचे नेते होते.
दामोदर तांडेल यांच्या निधनाचे वृत्त पसरताच कोळी बांधवांमध्ये दु:खाची लाट पसरली. अनेक मच्छीमार नेत्यांनी तांडेल यांना श्रद्धांजली वाहिली आहे. साधी राहणी आणि मनमिळावू स्वभाव अशी तांडेल यांची ख्याती होती. मच्छीरांच्या मागण्या मान्य न झाल्यास तांडेल यांनी अनेक मोर्चे काढले. तसेच वेळोवेळी आंदोलने छेडून सरकारला त्यांनी नेहमीच जाब विचारण्याचे काम केले आणि मच्छीमार समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मच्छीमार समाजावर होणारा अन्याय त्यांना कधीही सहन होत नसे. एखाद्या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या मच्छीमार बांधवांचा प्रश्न ते नेहमीच उचलत असत. अशा समस्या घेऊन ते सतत शासन दरबारी पाठपुरावा करून आवाज उठवत असत
शासन दरबारी आवाज उठवणारा मच्छीमार समाजाचा धडाडीचा कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड गेला. त्यांनी शासनाच्या एलईडी फिशिंग धोरणाविरुद्ध कोर्टात उभारलेल्या लढ्याच्या स्मृती समाजाच्या स्मरणात चिरकाल राहतील, अशा शब्दांत महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो आणि सरचिटणीस किरण कोळी यांनी तांडेल यांना श्रद्धांजली वाहिली आहे.







