ग्लोबिकॉन कंपनीने विषारी सांडपाणी नाल्यात सोडल्याने शेकडो माशांचा मृत्यू – शेतकऱ्यांचे मोठे नुकसान !!

uran-polutation

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात कोप्रोली खोपटा ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या ग्लोबिकॉन कंपनीने विषारी सांडपाणी कंपनीच्या आवाराबाहेर असलेल्या खाडीत सोडल्याने या खाडीतील आणि परिसरातील मत्स्य तलावातील शेकडो मासे मरून पडले आहेत. जस जसे नाल्यात हे विषारी पाणी झिरपून दुसऱ्या तलावांमध्ये जाईल तसे आणखी तलावांमध्ये विषबाधा होईल अशी भिती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त करण्यात येत आहे. हे विषारी पाणी या तलावांमध्ये गेल्यामुळे तलावातील पाणी दुषित झाले असून या पाण्याला दुर्गंधी येत आहे. यामुळे या तलावातील जिताडा, करपाल, बोईट, कोळंबी, कटला, काळामासा, घोया यासारखी महागडे मासे मरून पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे अर्थिक नुकसान झाले असून शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.uran-lake

 

कंपनीत कंटेनर धुतलेले पाणी कंपनीने नाल्यात सोडल्यामुळे हा प्रकार झाला आहे. हा प्रकार शेतकऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी तातडीने प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, तहसिलदार आणि कंपनी प्रशासनाला याबाबत माहिती दिली. प्रदुषण नियंत्रण मंडळाचे एचआरओ किशोर केरळीकर, महसूल विभागाचे मंडल अधिकारी हुसेन सय्यद, मनसेचे तालुका उपाध्यक्ष सत्यवान भगत आणि कंपनीच्या प्रशासनाने येथे पहाणी केली. सुरूवातीला कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याची जबाबदारी घेण्यास नकार दिला होता मात्र मनसेचे सत्यवान भगत यांनी आणि शेतकऱ्यांनी त्यांना कुठून पाणी सोडले हे दाखविल्यानंतर त्यांची बोलती बंद झाली. या बाबत ग्लोबिकॉनच्या व्यवस्थापकांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवू शकला नाही तर मंडल अधिकारी हुसेन सय्यद यांनी प्राथमिक माहिती देताना हे पाणी ग्लोबिकॉन कंपनीतूनच सोडण्यात आले असल्याचे दिसते असे सांगितले. या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. या बाबत मनसेचे उपाध्यक्ष सत्यवान भगत यांनी बेजबाबदार कंपनी प्रशासनावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

 

मात्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी हे उरण तालुक्यात वारंवार घडणाऱ्या अशा प्रकारच्या घटनाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याने व शेतकऱ्यांच्या या परिसरातील रहिवाशांच्या तक्रारी कडे आर्थिक हित संबंध जपत दुर्लक्ष करीत असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांना, रहिवाशांना न्याय मिळत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया मनसेचे तालुका उपाध्यक्ष सत्यवान भगत यांनी या प्रसंगी व्यक्त केली आहे.dead-fish

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here