मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या निधनामुळे काँग्रेस विचारधारेचा सच्चा पाईक हरपल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करताना चव्हाण म्हणाले की, त्यांनी आयुष्यभर काँग्रेसचा विचार उराशी बाळगून लोकसेवा केली.अगदी प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपली तत्त्व आणि मूल्ये कायम ठेवली.

ते सर्वसामान्यांशी नाळ जुळलेले एक लोकप्रिय नेते होते. सलग ३५ वर्षे आमदार म्हणून सातारा जिल्ह्यासाठी आणि सहकारमंत्री म्हणून महाराष्ट्रासाठी त्यांनी मोठे योगदान दिले.
तसेच स्व.डॉ.शंकरराव चव्हाण यांचे ते निकटचे सहकारी होते.त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रासह काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाल्याचे अशोक चव्हाण यांनी दिवंगत नेत्यास श्रद्धांजली वाहताना म्हटले आहे.







