मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – आदिवासी बांधवांच्या समाज जीवनाचा अभ्यास करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचा पालघर येथे अभ्यास दौरा संपन्न झाला.
इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च व मुंबई विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या समाज जीवनचा अभ्यास करण्यात येणार असून ह्या संशोधन प्रकल्पात मुंबई विद्यापीठाच्या तत्वज्ञान विभागाच्या प्रा.डॉ.नमिता निंबाळकर, अर्थशास्त्र विभागाच्या प्रा.डॉ. मेधा तापियावाला, समाज शास्त्र विभागाच्या प्रा.डॉ.रिटा मालचे आणि संशोधन सहाय्यक श्रीमती.अंजली सिंह, श्रीमती.हर्शिता झाला ह्यांचा समावेश आहे.
ह्या संशोधन प्रकल्पात पालघर जिल्ह्यातील कौस्तुभ घरत आणि भालचंद्र साळवे हे क्षेत्रकार्य समन्वयक म्हणून काम पहाणार आहेत.आदिवासी समाजाचे समकालीन प्रश्न, बदलत्या चालीरीती, पर्यावरणात होणारे बदल ह्या अनुषंगाने हे संशोधन होणार आहे.ह्या संशोधन गटाने आजच्या अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने पालघरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील ह्यांची तसेच पुढारी दैनिकाचे पालघरचे संपादक मंगेश तावडे ह्यांची सदिच्छा भेट घेवून संशोधन प्रकल्पाविषयी चर्चा केली.







