ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) -भिवंडीत कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पिंपळास गावाजवळ नाशिक येथून मुंबईकडे जाणाऱ्या एका भरधाव कार चालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटलं. नियंत्रण सुटल्यानं कारची खासगी बसबरोबर टक्कर होऊन भीषण अपघात झाला.
या अपघातात गाडीमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास घडला. अपघाताची माहिती मिळताच कोनगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या अपघातासंदर्भात नोंद घेऊन भरधाव कार चालविणाऱ्या कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गणपत पिंगळे यांनी दिली. गोकूळ मधुकर गवते (29 रा. निफाड नाशिक) पंकज भगीरथ जावळे (29 रा. अहमदनगर ) ज्वाला विजय बहादूर सिंग (27 रा. नाशिक) गौरव सुधीर सिंग (27 रा. नाशिक,) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावरील भिवंडी जवळील पिंपळास जवळ नाशिकहून मुंबईला जाणारी कार पहाटे 3:40 वाच्या सुमारास भरधाव वेगाने येत होती. त्यावेळी पिंपळास गावाच्या जवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार रस्त्यामधील दुभाजकावर आदळून विरुद्ध दिशेला फेकली गेली. त्याचवेळेस मुंबई बोरिवली नाशिक शिर्डीकडे जाणाऱ्या एका खासगी बस आणि या कारमध्ये जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला.
कोनगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणपत पिंगळे यांना माहिती मिळताच त्यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केले.या अपघाताबाबत कोनगाव पोलिसांनी कार चालक ज्वाला सिंग यांच्यावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक पिंगळे करत आहेत.







