मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री स्व.उमाताई भेंडे यांच्या स्मृतीचौकाचे सायन येथे करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार आशिष शेलार, शिक्षण मंत्री सौ. वर्षाताई गायकवाड, राजेश शिरवडकर जिल्हाध्यक्ष – भाजप, नगरसेविका – सौ.राजेश्री राजेश शिरवडकर, प्रकाश भेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचे 19 जुलै २०१७ निधन झाले. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. त्यांच्या पश्च्यात पती प्रकाश भेंडे, मुले प्रसाद भेंडे आणि प्रसन्न भेंडे, सूनबाई श्वेता महाडिक-भेंडे आणि नातवंड असा परिवार आहे.
साठ व सत्तरच्या दशकातील अनेक चित्रपटांतून उमा भेंडे संस्मरणीय भूमिका केल्या होत्या. 1960 साली ‘आकाशगंगा’ या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. मधुचंद्र, आम्ही जातो आमुच्या गावा, अंगाई, काका मला वाचवा, शेवटचा मालुसरा, मल्हारी मार्तंड, भालू, स्वयंवर झाले सीतेचे हे त्यांचे गाजलेले मराठी चित्रपट आहेत. त्यांनी मराठीसोबतच तामिळ, तेलगू चित्रपटांमध्येही काम केले. कोल्हापूरच्या असलेल्या उमाताईंचं मूळ नाव अनुसया असं होतं. ‘हवास तू’ हे त्यांचं गाणं खूपच गाजलं होतं. ‘गुडिया हमसे रुठेगी…’ हे हिंदी गाणंही त्यांच्यावरच चित्रित करण्यात आलं होतं.
त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाला अभिवादन करण्यासाठी तसेच त्यांच्या कार्याची स्मृती दिगंतर रहावी यासाठी त्यांचे वास्तव्य असलेल्या सायन येथील चौकाला त्यांचे नाव देण्यात आले आहे.








