मुंबई – दिवसेंदिवस मुंबईच्या रस्त्यावर जागोजागी आपल्याला भिकारी भिक मागताना आढळून येतात. मात्र आता लवकरच मुंबई भिकारी मुक्त होणार आहे. मुंबई पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी मुंबई भिकारी मुक्त करण्याचा जणू विडाच उचलला आहे. फेब्रुवारी महिन्यापासूनच ही मोहीम सुरु करण्यात येणार आहे.
मुंबईतील भिकाऱ्याविरोधात पोलीसांनी मोहिम उघडली आहे. मुंबई पोलीसांकडून भिक्षेकरी पकड मोहीम राबवण्यात येत आहे. या भिकाऱ्यांना पकडून चेंबूरच्या भिक्षेकरी स्वीकार केंद्रात ठेवण्यात येणार आहे. भीक मागणं हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे या कायद्याचे पालन करत पोलीस भिकाऱ्यांना पकडणार आहेत.
मुंबईमध्ये भीक मागण्यासाठी सर्वाधिक प्रमाणात लहान मुलांचा वापर करण्यात येतो. काही वेळेला ही मुले चोरुन आणलेली असतात. आणि त्यांना भीक मागण्यासाठी मारहाण केली जाते. लोकांची सहानभूती मिळवण्यासाठी या मुलांचा वापर भिक मागण्यासाठी केला जातो. ही मुले दिव्यांग असल्याचे सुद्धा काही वेळा भासवले जाते. किंवा मुलांना एखादा मोठा आजार असल्याचे खोटे सांगून सुद्धा भिक मागितली जाते. हे सर्व मुंबईतून हद्दपार होणे गरजेचे आहे.
मुंबईतील पहिली कारवाई आझाद मैदान पोलीस स्टेशनच्या पथकाकडून करण्यात आली. या हद्दीतील १४ भिक्षेकऱ्यांना आझाद मैदान पथकाने अटक करुन त्यांची रवानगी चेंबूरच्या ‘भिक्षेकरी स्वीकार गृह’ इथे करण्यात आली. भिक मागणे या प्रकाराला आळा घालण्यासाठी मुंबई पोलीस आता सज्ज झाले आहेत. पोलीसांनी युद्ध पातळीवर ही कारवाई सुरु केली आहे. त्यामुळे आगामी काही दिवसात मुंबईतून भिकारी हद्दपार झालेले पाहायला मिळतील यात शंका नाही.







