मुंबई (प्रतिनिधी) – करोनाचा काळ अद्याप संपलेला नसताना सुद्धा काही जण अद्यापही निष्काळजीपणे वागत आहेत. त्यामुळे करोना रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भारती कामडी यांना जिल्हा प्रशासनाने २०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. “नो मास्क, नो एन्ट्री” या राज्य सरकारच्या धोरणाचे उल्लंघन अध्यक्षांनी केले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात सतर्कतेचे संकेत देण्यात आले आहेत.
पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एका विषयावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलवली होती. त्या बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना सुद्धा निमंत्रण देण्यात होते. मात्र या बैठकीला उपस्थित असताना राज्य सरकारच्या “नो मास्क, नो एन्ट्री” चे पालन करताना त्या दिसून आल्या नाही. त्यांना मास्क बाबत विचारणा केली असता, त्यांनी आपण मास्क विसरले असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली.
राज्य शासनाच्या धोरणानुसार सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे त्यांच्यावर २०० रुपयांची दंडात्मक कारवाई करुन त्यांना एक नवीन मास्क देण्यात आला. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात मास्क घालण्याची सक्ती केली जात असून, याचे अनुकरण जिल्ह्यातील इतर ठिकाणी व्हावे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी व्यक्त केली आहे.







