मिस इंडिया उपविजेती मान्या सिंहची वडिलांच्या रिक्षातून कांदिवलीत रॅली

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – नुकत्याच झालेल्या मिस इंडिया स्पर्धेत मुंबईची 19 वर्षीय मान्या सिंह ही भले विजेती ठरली नसेल, तरी तिने साऱयांचे हृदय जिंकले आहे. मान्याच्या यशाला एका मोठय़ा संघर्षाची किनार आहे. ऑटोरिक्षा चालकाच्या या लेकीने डोळ्यांत स्वप्न घेऊन अफाट जिद्दीच्या जोरावर यश प्राप्त केले आहे. रात्रंदिवस घाम गाळणाऱ्या पित्याला मिठी मारून, कष्ट करणाऱ्या आईचे आशीर्वाद घेऊन पाणावलेल्या डोळ्याने रिक्षात बसलेल्या मान्याला बघून उपस्थितांचेही डोळे भरून आले. हा भावुक क्षण अनेकांनी मोबाईलमध्ये टिपला.

व्हिएलसीसी फेमिना मिस इंडिया 2020 स्पर्धेत मान्या सिंह फर्स्ट रनर अप होती. मान्या कांदिवलीला राहते. मंगळवारी मान्याची स्वागत मिरवणूक आणि सत्कार आयोजित करण्यात आला. वडील ओम प्रकाश यांच्या रिक्षातून ठाकूर व्हिलेजमध्ये मान्याची रॅली निघाली. रिक्षासमोर उभे राहून तिने प्रसारमाध्यमांना मुलाखती दिल्या. तिने काळा गाऊन घातला होता. तिच्या डोक्यावर मिस इंडिया उपविजेतेपदाचा मुकुट होता. लेकीबद्दल अभिमान तिच्या आईवडिलांच्या डोळ्यांत तरळत होता.

प्रबळ इच्छाशक्ती असेल तर काहीही साध्य होऊ शकते, हे मान्याने दाखवून दिलंय. मान्याने सांगितले, माझं रक्त, घाम आणि अश्रू यांनी मला हा विजय मिळवून दिला आहे. मी आणि माझ्या कुटुंबाने बऱ्याच रात्री उपाशीपोटी आणि झोपेशिवाय घालवल्या आहेत. मी किशोरवयातच काम करू लागले. मी दिवसा अभ्यास करायचे. संध्याकाळी भांडी घासायचे आणि रात्री कॉल सेन्टरमध्ये काम करायचे. रिक्षाचं भाडं वाचवण्यासाठी मी तासन् तास चालत घरी पोहोचायचे.

मला मदत करण्यासाठी माझ्या आई- वडिलांनी खूप त्रास सहन केला. माझ्या आईवडिलांचे काही दागिने गहाण ठेवले, त्यातून मी परीक्षेची फी भरू शकले आणि पदवी मिळवू शकले. मी फक्त एवढंच सांगेन की, जर आपल्या स्वप्नांवर आपला विश्वास असेल आणि ते पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध असाल तर जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here