मुंबई (प्रतिनिधी) – राज्यात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा टाळेबंदी लागू करण्याची वेळ येऊ नये, यासाठी गर्दी टाळणे, मुखपट्टीचा वापर करणे, समारंभ साधेपणाने साजरे करणे आदी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी जनतेला केले.
मुख्यमंत्र्यांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना
नियमांची कडक अंमलबजावणी करा. राज्यात सार्वजनिक ठिकाणी कोरोना नियमांचे पालन होताना दिसत नाही. अशा ठिकाणी आंदोलने, सभा, मिरवणुका यांना परवानगी देऊ नये, असे मुख्यमंत्री म्हणाले. ज्या भागात रुग्णसंख्या वाढतेय तेथे कंटेनमेंट झोन करायची तयारी ठेवावी, असेही ठाकरे यांनी सांगितले.मुखपट्टी न वापरणे किंवा अन्य नियमांचा भंग करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करावी, असा स्पष्ट आदेशही मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिला.
कोरोनाचा संसर्ग असलेल्या भागात किंवा परिसरात टार्गेटेड पद्धतीने तपासण्या करा, एकेक रुग्णाचे किमान 20 तरी संपर्क शोधून काढण्याचे निर्देश दिले.व्यावसायिक संस्था, संघटनांनी एसओपीची काटेकोर अंमलबजावणी करावी. बँक्वेट हॉलमध्ये कोणी विनामास्क आढळल्यास हॉल मालकावर कारवाई करणार विवाह समारंभासाठी पोलिस परवानगी आवश्यक.
जनआरोग्य योजनेला मुदतवाढ राज्यात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना सर्वसामान्यांना लागू असून त्याला 31 मार्चपर्यंत किंवा 2 महिने मुदतवाढ देण्यात येईल. कोरोना उपचारासाठी जी क्षेत्रीय रुग्णालये करण्यात आली आहेत, त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.






