मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – वरळी विधानसभेचे आमदार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात शिवसेना आणि मनसे विकासकामाच्या मुद्द्यावरुन आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहेत. स्थानिक शिवसेना नगरसेवक आशिष चेंबूरकर यांच्या प्रेमनगर भागातील एका विकासकामाच्या मुद्यावरुन मनसेने शिवसेनेवर टिकास्त्र सोडले आहे. मनसे केवळ राजकारणासाठी आरोप करत असल्याचा दाव शिवसेनेने केला आहे.
वरळीच्या प्रेमनगर भागात सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था झालेली आहे. याची माहिती स्थानिक नगरसेवकांना देण्यात आली होती. याची दखल स्थानिक लोकप्रतिनिधींनी घेतली. आणि शौचालयाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरवात केली होती. मात्र गेल्या २ महिन्यांपासून प्रत्यक्ष कामाला सुरवात झालेली नाही. लोकांना आजही त्याच परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
मनसेचे विभाग अध्यक्ष संतोष धुरी यांनी प्रेमनगर येथील शौचालयांना दरवाजे नाहीत, लाईट नाही, लोकांच्या तक्रारीकडे स्थानिक प्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप धुरी यांनी केला आहे. ही समस्या त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मांडली आणि स्थानिक लोकप्रतिनिधी हा राजकीय स्टंट असल्याचा आरोप मनसेवर केला.
मात्र शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक आशिष चेंबूरकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. प्रेमनगर भागातील शौचालयाच्या दुरुस्तीचे काम सुरु केले होते. पण स्थानिकांनी हे शौचालय दुरुस्त न करता तिथे नव्याने शौचालय बांधण्यात यावे, असे पत्र दिल्याचा दावा चेंबूरकरांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा याची नविन प्रक्रियेनुसार निविदा काढण्यात येईल आणि या कामाला सुरवात होईल, असे चेंबूरकर यांनी सांगितले. आणि राजकारणासाठी धुरी ही स्टंटबाजी करत असल्याचा आरोप शिवसेनेने लगावला आहे.






