राज्यातील शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली
ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – कोरोनामुळे शहरी भागात शाळा, कॉलेज बंद आहेत तर ग्रामीण भागात नेटवर्कअभावी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेता आलेले नाही. त्यामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी 50 टक्के गुणांवर आधारित लेखी परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी राज्यातील शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.
तोंडी, प्रात्यक्षिक आणि श्रेणी विषयांच्या अंतर्गत मूल्यमापनासाठी यंदाच्या वर्षी 50 टक्के गुण देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आल्याचे इंडिया वाईड पॅरेंट्स असोसिएशनच्या अध्यक्षा ऍड. अनुभा सहाय यांनी सांगितले. परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना बोर्डाने नमुना प्रश्नावली किंवा नमुना प्रश्नसंच देण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
शाळा बंद असल्याने यंदा प्रॅक्टिकल्सचा सराव झालेला नाही. त्यामुळे प्रयोग परीक्षेत विद्यार्थी प्रयोग कसे करणार हा प्रश्न आहे. यावर उपाय म्हणून बोर्डाने जरनल किंवा प्रोजेक्ट विद्यार्थ्यांकडून करून घ्यावेत, अशी मागणीही शिक्षणमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.






