एल्गार परिषद प्रकरणी शर्जील उस्मानीची हायकोर्टात धाव

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – येथील एल्गार परिषदेतील भाषणात आक्षेपार्ह भाषण केल्याबद्दल पोलिसांनी अलिगढ विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता शर्जील उस्मानी याच्याविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर त्याविरोधात त्याने आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. एफआयआर रद्द करावा किंवा याचिकेवरील अंतिम निर्णयापर्यंत एफआयआरच्या आधारे आपल्याविरोधात कोणतीही कारवाई करण्यास मनाई करावी, अशी विनंती शर्जीलने आपल्या याचिकेत केली आहे.

‘आजचा हिंदू समाज सडलेला आहे,’ असे वक्तव्य शर्जीलने आपल्या भाषणात केल्याने भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदीप गावडे यांच्या तक्रारीवरून स्वारगेट पोलिसांनी २ फेब्रुवारी रोजी शर्जीलविरोधात एफआयआर दाखल केला. त्याने भारतीय न्यायव्यवस्था व संसदेचा अनादर करणारीही वक्तव्ये केल्याचा आरोप आहे. आक्षेपार्ह वक्तव्ये करून सामाजिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मी ज्या संदर्भात ते वक्तव्य केले त्याकडे पहायला हवे. कोणत्याही समाजाचा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता. परंतु, सध्या समाजाची जी स्थिती आहे, ते मांडण्यासाठी मी माझे विचार मांडले. राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत हक्कांप्रमाणे मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यामुळे माझ्याविरोधात कोणताही दखलपात्र गुन्हा होत नसून, पोलिसांनी नोंदवलेला एफआयआर हा अत्यंत चुकीचा व हास्यास्पद आहे,’ असे म्हणणे शर्जीलने अॅड. अदिती सक्सेना यांच्यामार्फत केलेल्या याचिकेत मांडले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here