एत्तूमनूर (केरळ) – केरळ विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीमुळे सर्वाधिक चर्चा लतिका सुभाष यांची होत आहे. लतिका सुभाष या महिला काँग्रेस केरळ प्रदेशच्या अध्यक्ष आहेत. मात्र आज त्यांनी रविवारी या पदावरुन राजीनामा दिला. इतकचं नाही, तिकीट मिळालं नाही म्हणून विरोध करीत त्यांनी पक्षाच्या कार्यालयासमोर बसून आपले केस कापले. आता पक्षाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. काँग्रेस नेता तारिक अनवर म्हणाले की, युतीच्या निर्णयामुळे असं करता येऊ शकलं नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, केरळ विधानसभा निवडणुकीत लतिका सुभाष यांना एत्तूमनूर मतदारसंघातून तिकीट हवं होतं. मात्र ही जागा केरळ काँग्रेस (काँग्रेस पक्षाच्या युतीचा भाग)ला द्यावी लागली. ऑल इंडिया काँग्रेस समितीच्या तारिक अनवरने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
तारिकने सांगितलं की, आम्हाला या गोष्टीचं दु:ख आहे की, यंदाच्या वेळी आम्ही त्यांना तिकीट देऊ शकलो नाही. त्यांना एत्तूमनूर येथून तिकीट हवं होतं, मात्र येथील तिकीट केरळ काँग्रेस जोसेफ गुट यांना देण्यात आलं आहे. तारिक पुढे म्हणाले की, पक्ष त्यांना दुसऱ्या ठिकाणी तिकीत देऊ इच्छित होते, मात्र त्यांनी नकार दिला.






