आमदारांच्या नियोजनशून्य कारभाराला वैतागून स्वतंत्र गटात सामील – उपमहापौर सुनील खडके

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – पदासाठी नव्हे तर आमदारांच्या नियोजनशून्य कारभाराला वैतागून स्वतंत्र गटात सामील झालो. मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही आणि नव्हती अशी माहिती सुनील खडके यांनी आज पत्रकारांना दिली.

शहराच्या आमदारांच्या नियोजनशून्य कारभारामुळे आणि तुच्छ वागणुकीमुळे अनेक सदस्यांमध्ये असंतोष होता. उपमहापौर म्हणून अनेक जण माझ्याकडे येऊन नाराजी व्यक्त करत होते, शहरातील जनता वैतागली आहे, अशा वेळी त्यांच्यात जाऊन त्यांच्याशी संवाद साधणे गरजेचे होते. शहराचे नेतृत्व मात्र मूग गिळून गप्प बसले होते. तेव्हा मी स्वतः जनतेत जायचे ठरविले. उपमहापौर आपल्या दारी या अभियानाच्या दरम्यान मी जनतेच्या रोषाला सामोरा गेलो. त्या अभियानाच्या निष्कर्षांसंदर्भात आमदारांना अवगत देखील केले होते.

नागरिकांच्या छोट्या छोट्या समस्या देखील सुटत नव्हत्या त्यासाठी मी जनता दरबाराचे आयोजन केले. त्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र शहराचे नेतृत्व करणारे आमदारांच्या लक्षात आणून दिल्यानंतरही ते जनतेच्या समस्यांबाबत गंभीर नव्हते. नागरिक नगरसेवकांना जाब विचारात होते. सध्या निर्माण झालेली परिस्थिती याचेच द्योतक आहे.

जेव्हा निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा विद्यमान विरोधी पक्षनेते सुनीलभाऊ महाजन यांचेसह भाजपाच्या अनेक सदस्यांनी जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांची भेट घेतली. पुढे काय करावे यासंदर्भात त्यांचा सल्ला घेतला. त्या ठिकाणी भाजपच्या नगरसेवकांनी आपली कैफियत मांडली. मी स्वतः काही सदस्यांशी बोललो. पाच सदस्य माझ्यामुळे वेगळ्या गटात सामील झाले ही वस्तुस्थिती आहे. मात्र आम्ही भाजपाच्या सदस्यांनी पक्षांतर केलेले नाही. आम्ही आमचा वेगळा गट स्थापन करणार आहोत.

वास्तविक सत्तेच्या नवीन समीकरणात जयश्री महाजन महापौर पदाबाबत सर्वांचे एकमत झालेले होते. अशा वेळी मी उपमहापौर पदावर दावा केल्याने सामाजिक संतुलन होणारच नव्हते, ही बाब सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहे. असे असतांना माझ्यासाठी जेष्ठ नेते खडसे यांनी दबाव आणला असे म्हणणे योग्य नसल्याची भावना सुनील खडके यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here