मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र मध्ये अतिरिक्त लसीचा साठा असल्याचे आणि तरीदेखील लसीची मागणी महाराष्ट्र जास्त प्रमाणात करत असल्याच्या आशयाचे ट्विट नुकतेच केले होते. याच ट्विटला राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारपरिषदेत उत्तर दिले आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना बाधितांचे राज्य म्हणून पुढे येत आहे. सुरुवातीपासूनच महाराष्ट्रामध्ये कोरोना ग्रस्तांची संख्या जास्त प्रमाणात होती.
“महाराष्ट्रामध्ये लसीकरणाचे प्रमाण खूप मोठ्या संख्येने असल्याचे देखील त्यांनी सांगितले. दररोज महाराष्ट्रामध्ये तीन लाख याप्रमाणे लसीचा डोस दिले जातात. त्यामुळे आत्ता शिल्लक असलेला लसीचा साठा हा 30 लाख इतकाच आहे. म्हणजे येत्या दहा दिवसात महाराष्ट्रामध्ये लसीकरणाच्या बाबतीत तुटवडा जाणवू शकतो. प्रकाश जावडेकर यांचा मान राखून मी त्यांना हे सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये येत्या दहा दिवसात संपणार आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या चर्चेत देखील मुख्यमंत्र्यांनी हाच मुद्दा मांडला होता. मीही परत तेच म्हणेन की महाराष्ट्राला लसीची आवश्यकता आहे, म्हणूनच तेवढी मागणी होत आहे.”
राजेश टोपे म्हणाले की, “राज्यात लसीकरणावर भर दिला जात आहे. राज्यात एकूण 1880 सेंटर मंजूर झाले आहेत. आतापर्यंत 33 लाख 65 हजार 952 लोकांचं लसीकरण केलं आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रण्ट लाईन वर्कर, 60 वर्षांवरील आणि 45 वर्षांवरील इतर आजार असलेल्या लोकांचा समावेश आहे. काल दिवसभरात 2 लाख 32 हजार 340 एवढ्या लोकांचं लसीकरण झालं आहे. आता दिवसाला 3 लाख लोकांचं लसीकरण करण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी कोरोना लसही तेवढ्यात प्रमाणात प्राप्त होणं गरजेचं आहे. साधारणपणे एक कोटींहून लोकांचं लसीकरण करायचं आहे. दोन कोटी 30 लाख डोस आपल्याला येत्या तीन महिन्यात आवश्यक आहे. त्यासाठी आठवड्याला 20 लाख डोस आवश्यक आहे. मी स्वत: काल केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, आरोग्य सचिव राजेश भूषण यांना भेटून केली आहे.”
केंद्राने महाराष्ट्राला लसीचे डोस मोठ्या प्रमाणावर दिले नसल्याचे राज्य सरकारकडून अनेकदा म्हटले गेले आहे. त्यानुसारच केंद्राची बाजू मांडण्यासाठी जावडेकरांनी महाराष्ट्रात लसीचे डोस तसेच पडून आहेत आणि लसीकरण संथगतीने होत असल्याचे ट्विट करत महाराष्ट्राच्या सरकारवर निशाणा साधला होता.







