कोरोना खबरदारीच्या नियमांना औरंगाबादमध्ये हरताळ

औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ होत आहे, गेल्या तीन दिवसात औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकड्याने एक हजारांचा टप्पा पार केला आहे. वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी औरंगाबाद जिल्ह्यात अंशतः लॉकडाउन लावला आहे. राजकीय कार्यक्रम, सभा मंगल कार्यालयात लग्न लावण्यास देखील मनाई करण्यात आली आहे.

मात्र दुसरीकडे या सगळ्या नियमांना धाब्यावर बसवत औरंगाबाद जिल्ह्यातील राजकीय व्यक्तींनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा मेळावा घेतला. या मेळाव्याला मंत्री संदिपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, भाजपाचे आमदार हरिभाऊ बागडे, शिवसेनेचे दुसरे आमदार अंबादास दानवे, आमदार रमेश बोरणारे हे या मेळाव्यास उपस्थित होते. यातील एकाही नेत्याने तोंडाला मास्क लावला नव्हता, ना उपस्थित जनसमुदायाने मास्क लावले होते.

मास्क न लावता फिरणार्‍या लोकांवर जिल्हा प्रशासन कारवाई करते आहे. प्रत्येकाकडून पाचशे रुपये दंड वसूल केला जात आहे. त्यामुळे नियम सामान्य लोकांसाठीच आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता या सत्ताधारी नेत्यांवर जिल्हा प्रशासन कारवाई करणार का हाच खरा प्रश्न आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस खाते सामान्य नागरिकांना मास्क लावला नाही, म्हणून दररोज लाखोंचा दंड वसूल करीत आहेत आणि जनता आपली चूक झाली म्हणून गुमान दंडही भरत आहे.

जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन दंड भरणार का? लोकप्रतिनिधींचे जर कोरोनाचे नियम पाळत नसतील तर त्यांनी लोकांना नियम पाळा म्हणून कसं सांगू शकतात? सर्व गोंधळात औरंगाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव होत आहे. आज चोवीस तासात 1335 रुग्ण नव्याने समोर आलेत तर 17 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here