नवी दिल्ली – भारत-पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या सीमा भागात बुधवारी मध्यरात्री रात्री मोठा अपघात झाला. रात्री तीनच्या सुमारास सैन्याच्या जिप्सीला आग लागली. यात सैन्य दलाच्या तीन जवानांचा मृत्यू झाला असून ५ जवानांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. मृतांमध्ये एक सुभेदार आणि दोन जवानांचा समावेश आहे. अपघातानंतर जवळच्या ग्रामस्थांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले गेले.border
अपघाताचे कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही. सुरुवातीला जिप्सी कालवा उलटल्याने आग भडकल्याची बातमी मिळाली. पण जर तसे झाले असते, तर पाण्याने ही आग विझवली गेली असती. परंतु ही आग इतकी वेगात आणि मोठ्या प्रमाणावर पसरली की सैनिकांना सावरण्याची आणि स्वतःचे रक्षण करण्याचीही संधी मिळाली नाही.
भारतीय सैन्याने अद्याप मृत सैनिकांची नावे जाहीर केली नाहीत. परंतु त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना याबाबत कळवण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच जखमी सैनिकांना सुरतगडमधील सैन्य रुग्णालयात दाखल केले आहे. हे अपघातग्रस्त सैन्य कर्मचारी बठिंडाच्या ४७ – एडी युनिटचे असून हे सर्व सैनिक सरावासाठी सूरतगड येथे जात होते, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.






