कंगनाविरोधातील वॉरंट न्यायालयाकडून रद्द

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – गीतकार जावेद अख्तर यांची बदनामी केल्याच्या आरोप प्रकरणात जामीनपात्र वॉरंट निघाल्यानंतर अभिनेत्री कंगना रणोटने गुरुवारी अंधेरी न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजेरी लावली. त्यानंतर न्यायालयाने तिच्याविरोधातील वॉरंट रद्द केले.

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर कंगनाने टीव्हीला मुलाखती दिल्या होत्या आणि सोशल मीडियावरही विविध विधाने केली होती. त्या वेळी बॉलीवूडमध्ये कंपूशाही असल्याचा आरोप करून कंगनाने अख्तर यांच्याविरोधातही विधाने केली होती. त्यामुळे ‘कंगनाने माझ्याविरोधात निराधार व बदनामीकारक विधाने व बिनबुडाचे आरोप करून माझी बदनामी केली’, असा दावा अख्तर यांनी तक्रारीद्वारे केला.

न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जुहू पोलिसांनीही चौकशीअंती कंगनाच्या विरोधात अहवाल दिला. त्यानंतर समन्स बजावूनही कंगना न्यायालयात हजर राहिली नाही. त्यामुळे न्यायालयाने कंगनाविरोधात जामीनपात्र वॉरंट बजावून तिला २५ मार्चच्या सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कंगना गुरुवारी न्यायालयात हजर राहिल्यानंतर वॉरंट रद्द करण्यात आल्याची माहिती तिचे वकील अॅड. रिझवान सिद्दिकी यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here