ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – भांडूपमधील ड्रीम मॉलला लागलेल्या भीषण आगीत १० जणांचा मृत्यू झाला आहे. ही आग निष्काळजीपणाने लागल्याचे मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी म्हटले आहे. तर या आगीचे चौकशी करण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत. या आगीवरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिकेवर जोरदोर टीकास्त्र सोडले आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. न्यायालयाने अशा घटनांची सुमोटो पद्धतीने दखल घेत महापालिकेला दिशा निर्देश द्यायला हवेत. याचे कारण म्हणजे मुंबई महापालिका यंत्रणा आतून पूर्णपणे पोखरली गेली आहे, अशी जोरदार टीका फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिकेवर केली आहे.
मुंबईत आणि राज्यात कोव्हिड हॉस्पिटल्सची अग्निसुरक्षेचे ऑडिट तत्काळ व्हायला हवे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. जी घटना घडली आहे त्यात प्रशासनाचे दुर्लक्ष स्पष्ट दिसून येत आहे. आणखी अशा किती घटना सरकार होऊ देणार आहेत. यासाठी आपण कोणाला जबाबदार ठरवणार आहोत. आणि पुन्हा अशा घटना न घडण्यासाठी काय करता येईल हे सरकारने निश्चित करावे, असेही फडणवीस म्हणाले.
भांडुपच्या ड्रीम्स मॉलमध्ये मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत तब्बल दहा जणांचा मृत्यू झाला आहे. या आगीमुळे मॉलमधील सनराइज रुग्णालयातील ४६ रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले होते. तब्बल ११ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांना या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले होते.






