नागपूर (कार्यालय प्रतिनिधी) – गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र पालकमंत्री नितीन राऊत हे मात्र जिल्ह्यात नसल्याने संतापाचं वातावरण आहे. जनतेला वाऱ्यावर सोडून पालकमंत्री नितीन राऊत तामिळनाडू विधानसभेच्या प्रचारासाठी व्यस्त असल्याचा आरोप मनसेने केला आहे. यामुळे संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी आपण यांना पाहिलंत का? अशी शोधमोहीम हाती घेतली आहे. तसेच पालकमंत्री नितीन राऊत हरवल्याची पोलिसात तक्रार केली आहे.
पालकमंत्री नितीन राऊत जागेवर नसल्याने नागपूर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ‘पालकमंत्री नितीन राऊत यांना नेमकी कशाची काळजी आहे. त्यांचा पूर्ण वेळ तर निवडणूक प्रचारातच जात आहे. त्यांना जनतेची काळी नाही’, असा आरोप मनसे नागपूर सचिव घनश्याम निखाडे यांनी केला आहे. लॉकडाऊनमुळे गरिबांचं नुकसान होतं, अनेकांचे रोजगार बुडतात असा मुद्दाही मनसेने यावेळी उपस्थित केला.
कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने नागपूरचे पालकमंत्री यांनी नागपूरमध्ये आठवडाभर लॉकडाऊनची घोषणा केली होती. 15 मार्च ते 21 मार्चपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला होते. मात्र कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता आता 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता होळी, धुळीवंदन उत्सव नागरिकांनी साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना पालकमंत्री नितीन राऊत यांनी केल्या आहेत. तसेच नागरिकांनी लॉकडाऊनला नागरिकांनी सहकार्य करावे असं आवाहनही पालकमंत्री नितीन राऊत यांनी केले आहे.
नागपूर जिल्ह्यात शनिवारी 3,688 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 3227 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर एका दिवसात 54 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 14 हजार 850 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 1 लाख 72 हजार 634 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 37 हजार 434 कोरोनाच्या अॅक्टिव्ह केसेस आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे 4 हजार 873 जणांचा मृत्यू झाला आहे. नागपूरच्या विविध भागात कोरोनाचे हॉटस्पॉट तयार झाले आहे.






