औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – धुळे-सोलापूर महामार्गावर करोडी येथील पुलाखाली मालवाहू ट्रकने दुचाकीला चिरडले. या भीषण अपघातात वैजापूर तालुक्यातील परसोडा येथील पती-पत्नी जागी ठार झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली.
वैजापूर तालुक्यातील परसोडा येथील संजय पुनमचंद छानवाल, मीना संजय छानवाल हे दोघे पती-पत्नी सीडी डीलक्स गाडी क्र एमएच 20 डिएक्स 3179 वर कामानिमित्त औरंगाबाद शहराकडे येत होते. करोडी येथे नागपूर-मुंबई महामार्ग व सोलापूर-धुळे महामार्ग एकत्रित येतो.
या ठिकाणी असलेल्या पुलाखालून छानवाल गाडी घेऊन बाहेर पडले असता त्याच वेळी धुळे-सोलापूर उड्डाणपुलावरून आलेल्या ट्रकने (क्र. जीजे 03 बीडब्लू 2786) समोरून धडक दिली. अपघातानंतर ट्रकने दुचाकीला दूरवर फरफटत नेले. त्यामुळे ट्रकखाली सापडून छानवाल दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला






