मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – ज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता मिनी लॉकडाऊन अर्थात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. एप्रिलचा संपूर्ण महिनाभर हे निर्बंध असणार आहे. लोकांची गर्दी टाळावी यासाठी आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 3 महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यामुळे राज्यात ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्यात. त्यानंतर राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँका, पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. पण, राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 3 महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. औरंगाबाद महापालिका, कोल्हापूर महापालिका आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम आधीच लांबला आहे. त्यातच आता कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असल्यामुळे निवडणुकींचा निर्णयही लांबणीवर टाकण्यात आला आहे.
त्याचबरोबर राज्यात 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा होणार आहे. एकीकडे कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. पण शालेय शिक्षण मंडळाने परीक्षा घेण्यावर ठाम आहे. पुढील दोन दिवसांत या बद्दल चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, राज्यात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबद्दल सर्वच मंत्र्यांनी लॉकडाऊन न लागू करण्याचा सूर लगावला होता.
मध्यरात्रीपासून कडक निर्बंधाची अंमलबजावणी केली जाणार आहे. याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होणार आहे. महापालिका, एसटी महामंडळ आणि खासगी बसेसमधून प्रवास करण्यास मर्यादा घालण्यात आली आहे. बसमध्ये आता उभ्याने प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. बसमध्ये असलेली आसन व्यवस्थेनुसार, प्रवाशांना प्रवेश करण्यात मुभा देण्यात येणार आहे. राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्यास 500 रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.






