पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विवाह समारंभासाठी ५० लोकांची मर्यादा कायम ठेवण्यात आली असली तरी लसीकरण न झालेल्या वऱ्हाडींना समारंभामध्ये सहभागी होण्यापूर्वी ‘आरटीपीसीआर’ चाचणी करून निगेटिव्ह असल्याचा दाखला सोबत बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबतचे आदेश दिले असून या आदेशाचे पालन न केल्यास संबंधित प्रत्येक व्यक्तीला एक हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विवाह समारंभांना मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी हे आदेश देण्यात आले आहेत. विवाह समारंभासाठी ५० लोकांच्या उपस्थितीची अट कायम ठेवण्यात आली आहे. मात्र, संबंधित ५० लोकांचे लसीकरण झालेले असणे अत्यावश्यक आहे. लसीकरण झालेले नसल्यास समारंभाला उपस्थित राहणाऱ्यांनी ‘आरटीपीसीआर’ चाचणी करून निगेटिव्ह असल्याचा दाखला सोबत बाळगणे अनिवार्य असल्याचे जिल्हाधिकारी देशमुख यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.
मंगल कार्यालयांतील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण केलेले असावे किंवा त्यांची ‘ आरटीपीसीआर ’ चाचणी करून निगेटिव्ह असल्याचा दाखला सोबत बाळगावा, असेही जिल्हाधिकारी देशमुख यांनी आदेशात नमूद केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक हजार रुपये दंड आकारला जाणार आहे; तसेच मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापनाकडून उल्लंघन झाल्यास त्यांना दहा हजार रुपये दंड करण्याचे निर्देश देशमुख यांनी दिले आहेत. मंगल कार्यालय व्यवस्थापनाकडून वारंवार नियमाचा भंग झाल्यास त्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई होणार आहे.






