भाजपचे लक्ष्य आता महसूल खाते

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – महाविकास आघाडीच्या सरकारमधील वन आणि त्या पाठोपाठ गृह खात्याच्या मंत्र्यांना विविध आरोपांमुळे राजीनामे द्यावे लागले. त्यासाठी रान पेटविलेल्या भाजपने आता महसूल खात्याकडे मोर्चा वळविला असल्याचे दिसून येते. यासाठी वाळू तस्करीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. यासंबंधीचे पुरावे संकलित केल्याचा दावा भाजपचे नगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी केला आहे. सात दिवसांत यावर कारवाई झाली नाही, तर उपोषण करण्याचा इशाराच त्यांनी दिला आहे. ज्या आमदारांचा वाळू तस्करीला पाठिंबा नाही, त्यांनीही आपल्यासमवेत उपोषणात सहभागी व्हावे, असे आव्हानही विखे यांनी दिले आहे. नाव न घेता त्यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना या मुद्द्यावरून टार्गेट केल्याचे दिसून येते.

राज्यातील वन विभागाचे तत्कालीन मंत्री शिवसेनेचे संजय राठोड आणि तत्कालीन गृहमंत्री राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांना विविध आरोप झाल्याने मंत्रिदाचे राजीनामे द्यावे लागले. तेव्हापासून अन्य काही खात्यांच्या मंत्र्यांचाही नंबर लागणार असल्याची वक्तव्य भाजप नेत्यांकडून करण्यात येऊ लागली होती. काही दिवसांपूर्वी यासाठी पुढाकार घेत भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र खासदार डॉ. विखे यांनी काँग्रेसचे थोरात यांच्या महसूल विभागाला बदल्या आणि वाळू तस्करीच्या मुद्द्यांवरून टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. वाळू तस्करांना पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.आता खासदार डॉ. विखे यांनी थेट उपोषणाचाच इशारा दिला आहे. पारनेर तालुक्यात बोलताना त्यांनी हा थेट इशारा दिला. ते म्हणाले, ‘जिल्ह्यातून वाहणाऱ्या नदयांच्या पात्रात सध्या यंत्रांच्या सह्याने बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. लिलावातील अटी-शर्ती आणि नियम-कायदे धाब्यावर बसवून हा उपसा सुरू आहे. यासंबंधीचे व्हिडिओ, जीपीएस लोकेशन असे पुरावे आपल्याकडे आहेत. ते आपण जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहोत. यावर कारवाई करण्यासाठी त्यांना सात दिवसांची मुदत दिली जाईल. या मुदतीत योग्य ती कारवाई झाली नाही, तर आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहोत. संगमनेरसह अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने हे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे ज्या आमदारांचा यात सहभाग नाही, त्यांनीही आपल्या आंदोलनात सहभागी होऊन त्या त्या तहसिलदार कार्यालयासमोर उपोषणास बसावे. वाळू तस्करीविरोधात आपण ही पक्ष विहरित मोहीम सुरू केली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आशिर्वाद घेऊन हा लढा आपण उभारणार आहोत,’ असेही विखे यांनी म्हटले आहे.

 

नगर जिल्ह्याच्या राजकारणात विखे-थोरात संघर्ष जुनाच आहे. अलीकडेच झालेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत थोरात यांनी विखेंना मात देत पुन्हा सत्ता काबीज केली. ही निवडणूक खासदार डॉ. विखे यांनी प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे आता राज्यातील वातावरणाचा फायदा उठवत विखे यांनी महसूल खात्यातील वाळूचा विषय पुढे करून थोरात यांची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे यावरून दिसून येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here