कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादर) – पाण्याच्या टँकची स्वच्छता करताना शिरोळ येथील दत्त सहकारी साखर कारखान्यातील तीन कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाला. टँकमध्ये गॅस तयार झाल्याने ही दुर्देवी घटना घडली. मृतांमध्ये शिरोळ तालुक्यातील राजेश यशवंत ठुमके , गोपाळ सिद्राम जंगम व संदीप रमेश कांबळे यांचा समावेश आहे.
श्री दत्त साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पाणी पाईपला गळती लागली होती. त्यामुळे ती दुरूस्त करतानाच त्याची स्वच्छता करण्यासाठी एकेक करत तीन कामगार टाकीत उतरले. त्यामध्ये राजेश यशवंत ठुमके , गोपाळ सिद्राम जंगम व संदीप रमेश कांबळे यांचा समावेश होता. मात्र, टाकीमध्ये गॅस तयार झाल्याने या तीनही कर्मचाऱ्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यातून ते गुदमरल्याने तेथेच बेशुद्ध पडले. त्यांना वाचविण्यासाठी आणखी आणखी एक कर्मचारी त्या टाकीत उतरला. तोदेखील बेशुद्ध पडला. पण, इतर कर्मचाऱ्यांनी काहींना बाहेर काढले. त्यांना तातडीने कारखाना कार्यस्थळावरील दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी तीन कर्मचाऱ्यांना मृत घोषित केले. यामध्ये राजू रजपूत हा बचावला आहे. या दुर्घटनेचे वृत्त कळताच मृतांच्या नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला.
शिरोळ पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. दरम्यान, श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी पाटील म्हणाले, घडलेली घटना दुर्दैवी आहे. मृतांच्या परिवाराच्या पाठीशी कारखाना राहील. मृताच्या कुटुंबातील एकास नोकरी देण्यात येईल.






