मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) – कोव्हीड-१९ च्या प्रमुख हॉटस्पॉटपैकी एक असलेल्या महाराष्ट्रात लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे. परंतु मुंबईतील अनेक लसीकरण केंद्रे लसीचा साठा संपला म्हणून बंद करण्यात आली. शहरात कोव्हीड संक्रमित रुग्णांची वाढ होत असताना नेस्को लसीकरण केंद्रावर पहाटे चार वाजल्यापासून लोकांनी रांगा लावायला सुरवात केल्या. २९ एप्रिल रोजी मुंबईतील नेस्को लसीकरण केंद्र लसी संपल्यामुळे बंद करण्यात आले. त्यांनी ‘Vaccine is over, Closed for the day’, असा संदेशफलक गेटवर लावून नागरिकांना घरी परत जाण्यास सांगितले.
नेस्को लसीकरण केंद्रावर रांगेत उभ्या असलेल्या एका जेष्ठ नागरिकाने सांगितले, “सुरुवातीला मी बीकेसी सेंटरमध्ये गेलो होतो पण तेथे लसीकरण होत नव्हते म्हणून मी येथे आलो आणि लसीचा साठा संपला असल्याचे जाहीर झाले, म्हणून आता मी परत घरी जाऊन उद्या परत रांग लावायला येईन.”
केंद्रावरील लसीकरण बंद झाल्या कारणाने लोकांनी शासकीय यंत्रणा, तसेच आरोग्य विभागावर रोष व्यक्त केला. “एकीकडे राज्यात लसीचा तुटवडा भासत असताना आणि अशी केंद्र बंद होत असताना सरकार अस काय चमत्कार करणार आहे ज्याने सर्व लोकांना १ मे पासून मोफत लस उपलब्ध होणार आहे?” असा प्रश्न रांगेत उभे असलेल्या अनेकांनी सरकार तसेच आरोग्य यंत्रणांना विचारला आहे.






