परमबीर सिंग यांची उच्च न्यायालयात धाव; ठाकरे सरकारवर केला नवा गंभीर आरोप

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – महाराष्ट्र सरकारने लावलेल्या चौकशीच्या विरोधात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि राज्याच्या गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंग यांनी पुन्हा एकदा कोर्टात धाव घेतली आहे. कोर्टात केलेल्या याचिकेद्वारे परमबीर सिंग यांनी राज्य सरकारवरर नवा आरोप केला आहे. या याचिकेवर ४ मे रोजी सुनावणी होणार आहे.

परमबीर सिंग यांनी याचिकेत म्हटले आहे की, त्यांनी १९ एप्रिल रोजी राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांची भेट घेतली असता त्यांनी आपल्याला तक्रार मागे घेण्यास सांगितले. जर सिंग यांनी ही तक्रार मागे घेतली नाही, तर त्यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल करण्याची तयारी राज्य सरकारने सुरू करेल, असे पांडे म्हणाल्याचे सिंह यांनी नमूद केले आहे. हे पाहता या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणीच सिंग यांनी या याचिकेद्वारे केली आहे. सिंग यांनी याचिकेद्वारे राज्य सरकारवर हा नवा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. यापूर्वी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

परमबीर सिंग यांच्या विरोधात अकोला येथील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंग यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टसह विविध २२ कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोल्याच्या पोलीस अधिकारी भीमराज घाडगे यांनी ही तक्रार केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here